बीड- मुख्यमंत्री महोदय, यावर्षी १९७२ पेक्षा ही भीषण दुष्काळ आहे, तुम्ही कागदावर दुष्काळ जाहीर केला असला तरी, उपाययोजनांची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे शेतकर्यांना खरोखरच आधार द्यायचा असेल तर हेक्टरी ५० हजार रूपये तातडीने मदत द्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री सोमवारी (ता.१२) जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलतांना धनंजय मुंडे यांनी शेतकर्यांच्या व्यथा आणि वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मुंडे म्हणाले की, सरकारी अधिकारी कागदावर काहीही आकडे सांगत असले तरी, वस्तुस्थिती वेगळी आहे. शेतकर्यांना जाहीर केलेले बोंडअळीचे ३४हजार ५०० रूपये मिळाले नाहीत, पिक विम्याची रक्कम बँका स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहे. कर्जमाफीची प्रोत्साहनपर रक्कम शेतकर्यांना न देता कर्जखात्यात वळवून घेत आहेत. त्यामुळे बोंडअळी, पिक विमा आणि कर्जमाफीच्या कागदावरील आकड्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा फेरचौकशी करून पात्र शेतकर्यांना न्याय मिळवून द्या, पिक विमा रकमेचा वापर करणार्या डी.सी.सी. बँकेवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कासह शैक्षणिक शुल्क व उच्च शिक्षणासाठी मराठवाड्याबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. आदी मागण्या मुंडे यांनी केल्या.
















